भाजपाकडून माळशिरस विधानसभेसाठी अतुल सरतापे प्रबळ दावेदार!
भाजपातील जातीयवादी चांडाळचौकडींना बौध्द उमेदवार नकोसा
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): गेल्या पंधरा वर्षांपासून माळशिरस विधानसभा मतदारसंघात स्थानिक भूमीपुत्र असलेल्या बौध्द व मातंग समाजाला आमदार होण्याची संधी मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने सलग दोन टर्म मुंबईस्थित असलेल्या स्व. हनुमंतराव डोळस यांना आमदार केले. तर २०१९ साली भाजपाने रामभाऊ सातपुते या आयात उमेदवाराला आमदार केले. त्यामुळे २०२४ ला तरी भाजपाने माळशिरस विधानसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्याला आमदार करावे अशी स्थानिक कार्यकर्त्यांतून जोरदार मागणी केली जात असून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून बौध्द उमेदवार अतुल सरतापे हेच प्रबळ दावेदार असल्याची माळशिरस तालुक्यातून चर्चा होताना दिसत आहे.
अतुल सरतापे यांनी कधीही जातीपातीचे काम केले नाही. म्हणूनच ते माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या खास विश्वासातील आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही ते विश्वासू गोटातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने भाजपाचे काम करून अतुल सरतापे यांनी आपल्या कार्यातून भाजपा पक्षश्रेष्ठींंची मनं जिंकली आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांच्या हक्काचे ताटात वाढायची वेळ येते तेव्हा भाजपाने त्यांना भरभरून वाढले पाहिजे. पण भाजपातीलच काही जातीयवादी बांडगुळे बौद्धांच्या ताटात काही पडू नये यासाठी प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. भाजपाने ४०० पारचा नारा दिल्याने भाजपा बहुमताने सत्तेत आल्यावर संविधान बदलणार असा प्रचार करून महाविकास आघाडीने तापत्या तव्यावर आपली पोळी भाजून घेतली. मात्र आता तो निवडणूक जिंकण्यासाठी एक अपप्रचार होता असे लोकांना कळून चुकले आहे. तरीही भाजपा आंबेडकरी चळवळीच्या विरोधात काम करीत असल्याचा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे लोकांच्या डोक्यातील हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी भाजपाने माळशिरस विधानसभा मतदारसंघातील बौध्द समाजातील स्थानिक कार्यकर्त्याला आमदार केले तर महाराष्ट्रात भाजपाबद्दल एक चांगला मॅसेज जाऊ शकतो. भाजपाने उमेदवारी देताना निष्ठावंत व निष्कलंक कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी द्यावी. आणि माळशिरस तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने भाजपाचे काम करणारे बौध्द समाजातील अतुल सरतापे हेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भाजपाने ठरविले तर ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्त्याला आमदार करु शकतात. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी २५ वर्षे राखीव होऊनही सलग १५ वर्षे स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे माळशिरस तालुक्यात लोकसंख्येने सर्वात जास्त असलेल्या बौध्द समाजातील अतुल सरतापे यांना भाजपाने उमेदवारी दिली तर महाराष्ट्रात भाजपाला चांगला फायदा होईल आणि भाजपा हा पक्ष बौद्धांच्या विरोधात आहे अशी सुरू असलेली चर्चा थांबेल अशी माळशिरस विधानसभा मतदारसंघात चर्चा होताना दिसत आहे.