सुमित्रा पतसंस्था, विजय नागरी पतसंस्था आणि कारखान्यातील त्रस्त पिडीत मतदार जनता मोहिते पाटलांना धडा शिकविणार!
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे पारडे जड होणार
अकलूज (बंडखोर वृत्तसेवा): क्रांती ही जनतेने जनतेच्या हितासाठी, परिवर्तनासाठी करायची असते. याच क्रांतीची सुरूवात माळशिरस तालुक्यातून अकलूजच्या घराघरातून होणार आहे. सुमित्रा पतसंस्था आणि विजय नागरी पतसंस्थेतील पिडीत, शोषित ठेवीदार, कर्जदार मतपेटीव्दारे मोहिते पाटलांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. सुमित्रा पतसंस्था आणि विजय नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहार भ्रष्टाचारप्रकरणी गरूड मोर्चा काढणार होता, पण मांडवलीच्या राजकारणाने गोरगरीबांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. हे काळे कारनामे आहेत. उंच ठिकाणी बसला म्हणून कावळा गरूड होत नाही. हे संधीसाधू डोमकावळ्यांनी समजून घ्यावे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षकांना प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवून, भारतीय न्याय व्यवस्थेच्या आदर्श आचार संहितेचा भंग करून मोहिते पाटलांकडून शिक्षकांचा प्रचारात नियमबाह्य वापर करण्यात आलेला आहे हे अकलूज नगरपरिषदेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यापूर्वीच सेव्ह झालेले आहे. सदर सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन संबंधित लोकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अकलूज येथील शिक्षक प्रसारक मंडळाच्या शिक्षक वर्गाला नेहमीच सरंजामशाही वृत्तीच्या मोहिते पाटलांच्या दबावाखाली, दहशतीत काम करावे लागत आहे. यापूर्वी काही शिक्षकांना निवडणूक प्रचारात सहभागाबाबत निलंबित केल्याच्या घटना मोहिते पाटील वर्तमानपत्रात वाचत नाहीत का? शिक्षक शासनाचे पगार घेतात, जनतेच्या करातून त्यांचे वेतन होत असते. निवडणूक प्रचारात शिक्षकांचा प्रचार यंत्रणेत वापर करताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही. शिक्षक हे तुमचे गुलाम नाहीत हे मोहिते पाटील कधी समजून घेणार? कारखान्यातील कर्मचाऱ्यांना उन्हातान्हात फिरवायचे हे कोणत्या नियमात बसते? तुटपुंज्या वेतनावर त्यांना राबवून घ्यायचे आणि पालनहार, विकासाच्या गप्पा मारायला मोहिते पाटलांनो तुमची बरोबरी कुणीही करू शकणार नाही.
समजूतदार मनुष्य जगाशी जुळवून घेतो, तर हटवादी मनुष्य पक्षाने आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्याशी जुळवून घ्यावे याच अहंकारात असतो. त्यामुळेच आज शिवरत्नच्या मागे एकही विद्यमान आमदार नाही. ज्यांचे हृदय नेहमी द्वेषाने, खुनशी स्वभावाने भरलेले असते ते धैर्यशील यांच्यावर ३१ गुन्हे दाखल आहेत. भारत देशातील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर ३३ गुन्हे दाखल आहेत. यावरून आमचे राजकीय नेते कुठल्या दिशेने चालले आहेत? हाच युवाशक्तीने आदर्श ठेवायचा का? दुःखद घटना गरूडाच्या आणि सिंहाच्या पावलांनी येतात आणि मुंगीच्या पावलांनी जातात. आता तालुक्यात गरूड आणि सिंहाची युती झालेली आहे. पणगरूड आणि सिंहांनी हे लक्षात घ्यावे, मुंगी कुणाच्या अध्यात मध्यात नसते. जर का त्या मुंगीच्या कुणी वाट्याला गेले तर ती मुंगी कडकडून चावा घेते. ती मुंगी बलाढ्य हत्तीला लोळायला लावते. ही मुंग्यांची रांग ७ तारखेला लागणार आणि ४ जूनला सिंह आणि गरूडाला त्यांची औकातच दाखविणार असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.