Back To Top

वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांना अभय, तर आंबेडकरवादी डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांचा बळी!

बार्टीतील आंबेडकरवाद संपविण्यासाठी सचिव सुमंत भांगे व महासंचालक सुनील वारे यांचे संगनमत

पुणे (बंडखोर वृत्तसेवा): तत्कालीन महासंचालकांनी बार्टीच्या वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावर विविध आरोप ठेवून त्यांच्या विभागीय चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार आंदोलनकर्ते गौतम भंडारे, कविता गाडगे, महानंदा डाळिंबे व शकुंतला शेलार यांनी सातत्याने आंदोलने करून अस्वार यांच्या विभागीय चौकशीला गती दिली. मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे व महासंचालक सुनील वारे यांनी वेळोवेळी आंदोलनकर्त्यांची दिशाभूल करून इंदिरा अस्वार यांना वाचविण्याचाच प्रयत्न केला. परंतु आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांना घराघरात पोहोचविणाऱ्या व भीमराव ते बाबासाहेब ही वेबसिरीज काढून सवर्ण आणि आंबेडकरवादी समाजातील दरी दूर करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रचार आणि प्रसार विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांना कसलीही कल्पना न देता लम्पीचे कारण देऊन अचानक कार्यमुक्त केल्याने बार्टीतील आंबेडकवाद संपविण्यासाठी सचिव सुमंत भांगे व महासंचालक सुनील वारे यांनी संगनमताने वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांना अभय देऊन आंबेडकरवादी अधिकारी डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांचा बळी घेतल्याचे भीमसैनिकांतून बोलले जात आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा जागर करीत एससी समाजाच्या उत्थानासाठी कार्यरत असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही एकमेव स्वायत्त संस्था आहे. ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असल्याने व अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी घडवून आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला गती देणारी असल्याने ती आंबेडकरी समाजाची अस्मिता बनली आहे. मात्र या अस्मितेला आरएसएसचा गंज लागलेला असून आता मंत्रालयात व बार्टीत असलेल्या सनातनी विचारांच्या अधिकाऱ्यांनी बार्टीतील आंबेडकरवादी अधिकाऱ्यांनाच टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. तर ज्यांच्यावर विविध आरोप आहेत व ज्यांची विभागीय चौकशी सुरू आहे त्या वादग्रस्त इंदिरा अस्वार यांची मात्र सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठराखण केली जात आहे. गौतम भंडारे यांनी ८ जूनपासून वादग्रस्त इंदिरा अस्वार यांच्या विरोधात आंदोलनाला सुरूवात करून गेल्या वर्षभरापासून अस्वार यांच्या विरोधात वारंवार निवेदने देणाऱ्या कविता गाडगे, महानंदा डाळिंबे व शकुतंला शेलार यांना सोबत घेऊन पाचवेळा आंदोलने केली. मात्र सचिव सुमंत भांगे, उपसचिव दिनेश डिंगळे व महासंचालक सुनील वारे यांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही. १५ ऑगस्टला सर्व आंदोलनकर्त्यांनी निबंधक इंदिरा अस्वार यांच्या कार्यमुक्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर स्वतःला आंबेडकरी चळवळीचे व संविधानाचे गाढे अभ्यासक म्हणून मिरविणाऱ्या कंत्राटी कर्मचारी सुमेध थोरातने इंदिरा अस्वार कशा चांगल्या आहेत हे आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन सांगत इंदिरा अस्वार यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तर विधी विभागाचे प्रमुख हेमंत अहिवळे यांनीही आंदोलनकर्त्यांना पत्र देताना पत्रात विभागीय चौकशीचा मुद्दा मेन्शन करायला सांगूनही निबंधक इंदिरा अस्वार यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्याशी दहा ते पंधरा मिनीटे चर्चा केल्यानंतर महासंचालकांचाच निर्णय धुडकावून बार्टीत महासंचालकांपेक्षा निबंधकच मोठा असल्याचे दाखवून दिले. एकंदरीत आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी बार्टीतील काही कंत्राटी बौध्द कर्मचारी वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार यांची तळी उचलताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी हेमंत अहिवळे व सुमेध थोरात यांनी प्रचार व प्रसार विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्याबद्दल त्यांच्या अनुपस्थितीत अपशब्द वापरले होते. त्यानंतर काही लोकांना हाताशी धरून बार्टीत ते कामावर नसताना त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने त्यांचे पर्सनल लाईफमधील फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले होते. त्यामुळे डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी कोरेगांव पार्क पोलिस स्टेशनला याबद्दल तक्रारही दाखल केली होती. तसेच डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्याकडे आयबीपीएसचा चार्ज असताना त्यांना विश्वासात न घेता निबंधक इंदिरा अस्वार यांनी वाडिया कॉलेजमधील शंभर विद्यार्थ्यांबरोबर आयबीपीएसचा करार केला होता.
दरम्यान डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण हे आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी मानून चळवळीसाठी तळमळीने काम करणारे अधिकारी आहेत. सवर्ण व बौध्द समाजामध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी ते भीमराव ते बाबासाहेब ही वेबसिरीज करण्यासाठी धडपडणारे अधिकारी आहेत. डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी माणगांव परिषदेचा कार्यक्रम शासनस्तरावर मंजूर केला. ही बाब सनातनी विचारांच्या बार्टीतील अधिकारी व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही खटकणारी होती. काही दिवसांपूर्वी बार्टीत आमची एक भगिनी महासंचालक सुनील वारे यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्यासमोर आरएसएसचे काही स्वयंसेवक महासंचालक सुनील वारे यांना आपण मिळून याठिकाणी आरएसएसचे काम करू, पूर्वीच्या महासंचालकांनी आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता असे म्हणाले होते. आम्हाला पूर्वीपासूनच वाटत होते की बार्टीचा सत्यानाश करण्यासाठीच सुनील वारे यांची नियुक्ती केली आहे. तो ट्रेलर त्यांनी दाखवायला सुरूवात केली आहे. तत्कालीन महासंचालकांनी निबंधक इंदिरा अस्वार यांना पदमुक्त केल्यानंतर त्या मॅटमध्ये जाऊन पुन्हा आहे त्याठिकाणी परत आल्या. तेव्हा महासंचालक यांनी शासनाला अहवाल दिल्यावर अस्वार यांच्यावरील कारवाई ठरणार होती. मात्र महासंचालक सुनील वारे यांनी वादग्रस्त इंदिरा अस्वार यांच्यावर विविध आरोप असतानाही त्यांना पूरक असा शासनाला अहवाल देऊन त्यांना वाचविले. परंतु बार्टीत एकमेव आंबेडकरी चळवळीचे अधिकारी राहिलेल्या डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांना कार्यमुक्त करण्यासाठी ते मुंबईत दोन दिवस राहिले. यावरूनच बार्टीला सनातनी अधिकाऱ्यांची कीड लागलेली दिसत असून आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटनेतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपली अस्मिता वाचवून बार्टीला आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांची कार्यमुक्ती रद्द करण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा, तरच पुन्हा एकदा बार्टी हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनेल, अन्यथा तो आरएसएसचा मुख्य अड्डा बनल्याशिवाय राहणार नाही.

Prev Post

पथ विक्रेत्यांना अमानुष व बेकायदेशीर मारहाण व तक्रारदारांवर अन्याय करणाऱ्या…

Next Post

राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवात ‘यात्रा’, ‘जवाबों का सफर’ची बाजी

post-bars

Leave a Comment