आमदार म्हणून एससी समाजाच्या बोकांडी बसलेल्या उत्तम जानकरांच्या मुलांची जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून एससी समाजात घुसखोरी !
आता मागासवर्गीयांनी प्रस्थापितांच्या पालख्याच वहायच्या का?
माळशिरस (बंडखोर वृत्तसेवा): सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 9 गटापैकी दहिगाव, वेळापूर, बोरगाव आणि माळीनगर हे चार गट एससी समाजासाठी राखीव आहेत. या गटांपैकी दहिगाव गटात एससी समाजाच्या बोगस दाखल्याआधारे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या उत्तम जानकर यांचे सूपुत्र जीवन उत्तम जानकर व मुलगी ज्योती उत्तम जानकर या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन ओरिजनल एसी समाजाच्या जागेवर घुसखोरी केली आहे. आमदार उत्तम जानकर व त्यांच्या मुलांनी अशाच पद्धतीने एसी समाजात घुसखोरी केली तर मागासवर्गीयांनी या प्रस्थापितांच्या पालख्याच वहायच्या का? असा संतप्त प्रश्न एससी समाजातून उपस्थित केला जात आहे.
मोहिते पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे लढणारा नेता म्हणून एससी समाजातील काही लोकांनी जानकरांच्या बोगस दाखल्याला सहकार्य केले होते. मात्र जसे उंटाचे पिल्लू झोपडीत शिरल्यानंतर ते बाहेर निघताना झोपडीला उध्वस्त करूनच बाहेर निघते, त्या पद्धतीने उत्तम जानकरांनी एसी समाजाच्या बोगस दाखल्याचा वापर करून एसी समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचे काम केले आहे. बोगस दाखल्याच्या आधारे स्वतः आमदार झाल्यानंतर उत्तम जानकरांनी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या मुलांनाही उतरवले आहे. सत्तेचा किती हा हव्यास? आमदार उत्तम जानकरांना ग्रामपंचायतपासून संसदीय राजकारणापर्यंत ओरिजनल एसी समाजाच्या जागेवर घुसखोरीच करायची आहे काय? 59 जातींपैकी कुठल्याही एका जातीने उमेदवारी दाखल केली असती तर तो ओरिजिनल एसी समाजाला लाभ मिळाला असता. परंतु उत्तम जानकरांनी बोगस दाखल्याच्या आधारे आपल्या मुलांना दहिगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून एससी समाजाच्या हक्काच्या जागेवर गडांतर आणले आहे. मग एससी समाजानं काय त्यांच्या तोंडाकडेच बघत बसायचे का? राजकीय घुसखोरी बरोबरच आता आमदार उत्तम जानकर विविध क्षेत्रात घुसखोरी करतील. तरीही याबाबत कुणी बोलणार नाही. या विरोधात कायदेशीर लढाई सुरू आहे, मात्र ती नेमकी कुठे अडकलीय हा एक संशोधनाचाच विषय आहे. मोहिते पाटलांच्या कृपाशीर्वादाने उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले असले तरी आता त्यांच्या सूपुत्रांना दहिगाव गटात वेळीच रोखणे गरजेचे आहे. नाहीतर अशा प्रवृत्तींमुळे एससी आरक्षणाचे तीन तेरा नऊ अठरा झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की !