मग्रुर राजपुत्राची किळसवाणी लाचारी!
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी मंत्रीपद पटकावले होते. मात्र त्यांचे सूपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे कमनशिबीच! वयाच्या ५६ व्या वर्षीही ते मंत्रीपद तर दूरच, जनतेतूनही निवडून गेले नाहीत. आपल्या मग्रुरीमुळे, अहंकारामुळे पराभवाला सामोरे जावे लागेल ही भीती त्यांना वाटत असावी. २०१० साली राज्यसभेवर दीड वर्षासाठी ते खासदार झाले, त्यानंतर २०२० साली भाजपाने त्यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. मात्र ही आमदारकी टिकवून स्वतःच्या राजकीय सोयीसाठी शिवरत्नचे राजपुत्र असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी जी किळसवाणी लाचारी सुरू केली आहे ती पाहता, स्वाभिमानी अकलूजकरांना आपली मान खाली घालावी लागत आहे.
२००९ पूर्वी शिवरत्नवरील मोहिते पाटलांचा एक वेगळाच ताल होता. सोलापूर जिल्ह्यातील एकही आमदार त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हता. मोहिते पाटील ठरवतील तीच पूर्वदिशा असायची. त्यामुळे राजपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांचे विमान जमिनीवर उतरतच नव्हते. तीच सवय त्यांच्या राजकीय पिछेहाटीला कारणीभूत ठरलेली आहे. हे राजपुत्र कुणी नमस्कार केला तरी त्यांच्याकडे बघत सुध्दा नव्हते. इतकी मग्रुरी, अहंकार त्यांच्यात ठासून भरलेला आहे. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यापासून राजकारणात मोहिते पाटील यांची घसरण सुरू आहे ती आजतागायत सुरूच आहे. त्यामुळे आपले सूपुत्र रणजितसिंह यांच्या राजकीय भवितव्यासाठी २०१९ साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात स्वतः प्रवेश न करता आपल्या मुलासह पुतणे व इतर घरातील सदस्यांना पाठवले. यादरम्यान ठरल्याप्रमाणे मोहिते पाटलांनी भाजपाला एक खासदार व एक आमदार निवडून दिल्यानंतर भाजपाने रणजितसिंह मोहिते पाटलांना २०२० साली विधानपरिषदेची आमदारकी दिली, पण त्यांनी बंगल्यात बसून भाजपाच्याच विरोधात काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. २०२४ साली भाजपाने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आपण भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करायचे का? असा प्रश्न उपस्थित करून मोहिते पाटलांनी भाजपाच्या विरोधात बंडाचा पवित्रा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. तेव्हा माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली व ते खासदार म्हणून निवडूनही आले. यादरम्यान प्रचारसभेसाठी माळशिरसला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, अकलूजला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी तरीही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या सभांना उपस्थित राहिले नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदारकीचे उमेदवार असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांची त्यांनी मतदानादिवशी गळाभेट घेतली. तेच विधानसभेतही झाले. भाजपाकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राम सातपुते निवडणूक लढवत असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्यांचाही प्रचार केला नाही. मात्र भाजपाचे काम न करता आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी व सत्तेच्या लोभापायी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांची भेट फडणवीसांनी टाळली. अकलूज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील कुटुंबातील चार सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी चार दिवस तळ ठोकला होता, तरीही फडणवीस त्यांना भेटले नाहीत अशी माहिती त्यांच्याच निकटवर्तीयांकडून समजली. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ जाऊन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत असल्यामुळे अनेकांना त्यांची किव येत आहे. यामुळे रणजितसिंह टीकेचे धनी होत आहेत, तरीही याचे त्यांना काही वाटत नाही. अकलूज नगरपरिषदेच्या एबी फॉर्मसाठी रणजितसिंह मोहिते पाटलांनी खूप प्रयत्न केले, आपली भेट होईना म्हणून कसेबसे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सह्याद्री सभागृहात भेटून यापुढे तुम्ही म्हणाल ते करेन, फक्त एक संधी द्या असे म्हणून रणजितसिंह मोहिते पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे विनंती केली. परंतु आता वेळ निघून गेली आहे असे फडणवीस म्हणाले. कितीही लाचारी! आपलेच बंधू धैर्यशील मोहिते पाटील किती स्वाभिमानी आहेत, त्यांच्याकडून थोडेसे शिका. परिणामांची पर्वा न करता धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या विरोधात बंड केले व ते खासदारही झाले, त्यांनी जनतेतून लढण्याचे धाडस दाखवले. आपल्या नेतृत्व क्षमतेत ते सर्वांपेक्षा पुढेच आहेत. पण आपण तर अकलूजकरांची मान शरमेने खाली घालवत आहात. ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना तुम्ही नरकयातना देण्याचे काम करीत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागपूरचे भोसले घराणे यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. आणि आपली पत्नी त्याच घराण्यातील असल्यामुळे फडणवीस आपल्यावरील कारवाईस हात थोडासा आखडता घेत आहेत. ज्या मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावरून महाराष्ट्राचे राजकारण ठरत होते, तोच बंगला आज सत्ताधारी भाजपासमोर लाचार झाला आहे. याचे सर्वांत मुख्य कारण म्हणजे राजपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हेच आहेत. या राजपुत्राच्या किळसवाण्या लाचारीने अकलूजकर मात्र गलितगात्र झाले आहेत.