संविधान समता दिंडीत होतोय समतेचा जागर!
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे येणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत बार्टीची संविधान दिंडी २०१४ पासून येत आहे. भजन, किर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून संविधानातील मूल्ये, विशेषतः समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांचा प्रसार करणे हा या दिंडीचा उद्देश होता. मात्र बार्टीच्या संविधान दिंडीच्या माध्यमातून २०१४ साली प्रकाशित झालेले भारतीय संविधान प्रमुख पाहुण्यांना देऊन व साऊंडवर संविधानाबद्दल जागृती करीत असल्याचा भास निर्माण केला जात आहे. तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत अकलूजमध्ये श्यामसुंदर महाराज सोन्नर यांची आलेली संविधान समता दिंडी ही खऱ्या अर्थाने आपल्या प्रवचनातून, किर्तनातून समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा प्रचार आणि प्रसार करीत असल्याने संविधानप्रेमींनी समतेचा जागर करणाऱ्या श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
श्यामसुंदर महाराज सोन्नर हे गेल्या सात वर्षांपासून संविधान समता दिंडी लोकवर्गणीतून काढत आहेत. संविधानाला जेव्हा ७० वर्षे पूर्ण झाली तेव्हा संविधानाचा जागर झाला पाहिजे म्हणून श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी ७० किर्तनं करण्याचा संकल्प केला होता. आणि त्याच संकल्पाचं पुढचं रूप म्हणजे संविधान दिंडी आहे. वारकरी संतांनी ७०० वर्षे ज्या मानवी मूल्यांचा जागर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केला की, ज्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय याची भूमिका आपल्याला जागोजागी दिसते. संत विचार आणि संविधान हे परस्पर पूरक आहे, संविधान कुठल्या एका जातीचं नाही, कुठल्या एका धर्माचं नाही, कुठल्या एका पंथाचं नाही. आणि फक्त पुरूषांचं नाही, तर स्त्रियांचं सुध्दा आहे. याठिकाणी आपली मतं मांडण्याचा, आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. याचा हुंकार ७०० वर्षांपूर्वी या भूमीमध्ये झाला आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानामध्ये उमटलेले दिसते. जगात स्त्री आहे की पुरुष आहे म्हणून कुणाचा भेदभाव करू नका, कोणत्या जातीचा आहे की धर्माचा आहे म्हणून भेदभाव करू नका, इतके जरी केले तरी खऱ्या अर्थाने आम्ही संविधान दिंडी घेऊन निघालो याचे सार्थक झाले असे वाटेल असे आमच्याशी बोलताना श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले. बातमी लिहीत असताना श्रीराम मंदिराजवळ संविधान दिंडी आलेली आहे तिकडे या म्हणून मला वंचित बहुजन आघाडीचे अभिजीत गायकवाड यांनी फोन करून बोलविले. तेव्हा तिथे गेल्यानंतर त्याठिकाणी अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच विठ्ठल (नाना) गायकवाड, रिपाइं (आठवले) चे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, रिपाइं (आठवले) युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे व वंचित बहुजन आघाडीचे अभिजीत गायकवाड, पप्पू गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांनी ‘संत व संविधान’ हे पुस्तक माझ्या हाती दिले. या पुस्तकात संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त केलेल्या ७ संविधान किर्तन मालिकांचा समावेश आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सारनाथ बुध्द विहारात त्यांचा कार्यक्रम आयोजित केला असता त्यांनी सदरचा कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे व साताऱ्याचे शाहीर त्याठिकाणी असल्यामुळे अवघ्या १५ मिनिटांत कार्यक्रम आटोपून पुढच्या वर्षी २ तासाचा कार्यक्रम आंबेडकर चौकात घेऊ या असे म्हटले. वास्तविक पाहता श्यामसुंदर महाराज सोन्नर हे श्री संत तुकाराम महाराज पालखीत संविधान समता दिंडी घेऊन येत असल्याने काही मनुवाद्यांनी त्यांना विरोध केला होता. तर आरएसएसच्या काही लोकांनी श्यामसुंदर महाराज सोन्नर हे पालखीतील वातावरण गढूळ करतात, ते लोकांना भडकवतात अशाप्रकारची तक्रार केली होती. वास्तविक पाहता संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्व लोकांना किर्तनाच्या माध्यमातून सांगणे हा काय गुन्हा आहे का? संतांचे विचार व संविधान याचा मेळ घालून ते किर्तन करीत असल्याने मनुवाद्यांची पोटदुखी वाढतेय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला ते बदनाम करीत असताना संत तुकाराम महाराजांच्या पालखीत संतांचे दाखले देत संविधान सांगितलेले मनुवाद्यांना कसे रूचेल? संविधान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर किर्तन हे एक चांगले माध्यम आहे हे पाहूनच संत विचार व संविधानाची साम्यस्थळे शोधून श्यामसुंदर महाराज सोन्नर किर्तन व प्रवचन करू लागले. श्यामसुंदर सोन्नर यांच्या दिंडीभोवती दोन पोलिसांची सुरक्षा होती. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा प्रसार करीत असतानाही पोलिस संरक्षण घ्यावे लागते हे पाहून आश्चर्य वाटते. बार्टीच्या माध्यमातून निघणाऱ्या संविधान दिंडीकडे कुणी सहसा लक्ष देत नाही. पण श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या संविधान समता दिंडीला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने आता खऱ्या अर्थाने संत विचारांचा संदर्भ देऊन संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रिसूत्रीचा जागर करणाऱ्या श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या दिंडीचे संविधानप्रेमींनी स्वागत करून पुढच्या वर्षी ठिकठिकाणी त्यांच्या किर्तनाचे कार्यक्रम राबवावेत हीच अपेक्षा!