शिवतेजसिंहांचा अतिउतावीळपणा शिवरत्नला पुन्हा खड्ड्यात घालणार?
माढा (बंडखोर वृत्तसेवा): महायुतीच्या विरोधातील लाट व शरद पवारांबद्दलच्या सहानुभूतीमुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोहिते पाटलांना तारले. यादरम्यान उत्तम जानकर व मोहिते पाटील एकत्र येऊनही धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यात कमी मतदान झाले, मात्र माढा आणि करमाळ्यातील मताधिक्यामुळे ते खासदार झाले. परंतु मोहिते पाटील पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी शिवतेजसिंह मोहिते पाटलांना माढ्यातून आमदार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यानच्या काळात शिवतेजसिंह यांनीही माढा विधानसभा मतदारसंघात दौरे वाढविल्याने आमदार बबनराव शिंदे समर्थकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून शिवतेजसिंहांचा अतिउतावीळपणा शिवरत्नला पुन्हा एकदा खड्ड्यात घालणार अशा प्रतिक्रिया राजकीय जाणकारांतून उमटत आहेत.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी २००९ साली आपल्या अनिर्बंध सत्तेच्या जोरावर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सुधाकरपंत परिचारक यांना थांबवून तेथून विधानसभा निवडणूक लढवली होती. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणालाच रुचली नव्हती. त्यामुळे सर्वांनी मिळून विजयसिंह मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला होता. तेव्हापासून राजकीय विजनवासात गेलेल्या मोहिते पाटलांना भाजपाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली. पण घरात कुठलेही पद नसल्याने शिवरत्न अस्वस्थ होता. मात्र शिवरत्नला पुन्हा एकदा सत्ताकेंद्र बनण्याची संधी देण्यासाठी शरद पवार देव बनून धाऊन आले व कुणालाही अपेक्षित नसलेले धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले. यादरम्यान मोहिते पाटलांची कर्मभूमी असलेल्या माळशिरसमध्ये कमी मतदान झाले, तर माढा व करमाळ्याने ९४०२६ इतके मताधिक्य देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार केले. हा चमत्कार केवळ शरद पवारांमुळे घडला. परंतु शिवरत्नला सत्तेची ऊब लागताच मोहिते पाटलांनी माढ्यातून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे मोहिते पाटील समर्थकांतूनच बोलले जात आहे. याबाबत सोशल मीडियावर जोरात काम सुरू असून शिवतेजसिंहांनी सुध्दा माढा विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. ही बाब निश्चितच शिंदे बंधूंना खटकणारी आहे. ज्यांनी मोहिते पाटलांना सत्तेत आणले त्यांच्याच मतदारसंघात मोहिते पाटलांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याने याठिकाणी पुन्हा २००९ ची पुनरावृत्ती घडविण्यासाठी सर्व एकत्र येतील. याबाबत आम्ही मागील अंकात सविस्तर मांडलेच आहे. राजकारणात संधी सर्वांना मिळाली पाहिजे, प्रत्येक तालुक्यावर स्थानिक नेतृत्वाचाच अधिकार असावा. नेतृत्व कितीही मोठे असले तरी स्थानिकांना डावलून त्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ केलेले कुणाला अजिबात आवडत नसते. यातूनच नेतृत्व लयास जाते हा दांडगा अनुभव शिवरत्नला यापूर्वीच आलेला आहे. ‘दूध पोळले की ताकही फुंकून पितात’ अशी एक म्हण आहे. त्यामुळे शरद पवाररुपी दैवताच्या माध्यमातून शिवरत्नला सत्ताकेंद्र बनण्याची मिळालेली संधी इतर मतदारसंघात लुडबुड करुन वाया घालवू नये. थोडे बळ येताच पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे शिवरत्नने कुरघोड्यांचे राजकारण सुरू ठेवून अतिउतावीळपणा केला तर शिवरत्न पुन्हा एकदा खड्ड्यात जाईल हे मात्र नक्की असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.